Wednesday, 29 April 2015

माध्यम.... मराठी का इंग्रजी ???

परवा आम्ही मित्र-मित्र बोलत असताना पुन्हा एकदा मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हा विषय निघाला. पुन्हा एकदा म्हणजे आधी अक्षरश: शेकडो वेळा या विषयावर आमचे बोलणे झाले आहे...पण मी शक्यतो त्या वादात पडलो नाही...

तथाकथीत मत हे आहे...आणि लेखक भालचंद्र नेमाडे यांनीही ते बोलून दाखवले आहे..... की सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या चूक आहेत आणि जर आपल्याला मराठी भाषा टिकवायची असेल तर मुलांना मराठी शाळेत घाला आणि जे पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत घालतात, ते मराठीचे, मराठी भाषेचे कट्टर वैरी आहेत.. अशा पालकांना वाटतच नाही की मराठी भाषा टिकावी म्हणून....आणि आपण इथे फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळांविषयी बोलतोय....CBSE, ICSE नाही....

ह्या स्वयंघोषित भाषाप्रेमींचा एकेक मुद्दा घेऊ....

मुद्दा 1: "तुम्ही स्वत: मराठी शाळेत शिकलात ना...मग मुलांना मराठी शाळेत का नाही घातले?"

माझा पहिला प्रश्न ..."तुम्ही घातलेय का?"...खूप वेळा उत्तर "नाही"..असेच येते...म्हणजे मुद्दाच संपला ना... तरीसुद्धा...मी मराठी शाळेत गेलो....हो...पण मी माझ्या मुलींना इंग्रजी शाळेत घातलेय...कारण..मी शाळेत असताना तेव्हाचे शिक्षक...त्यांचा दर्जा,त्यांची विषय स्वत: समजून घेण्याची आणि मग तो विद्यार्थ्यांना समजून देण्याची कुवत ह्या गोष्टी आता कुठे पाहायला मिळत असतील तर सांगा...ना ते शिक्षक राहिले..ना तशा तत्वांना अनुसरुन काम करणार्‍या शाळा ...
इथे मराठी शाळांमधील शिक्षकांना ना धड शुद्ध मराठी बोलता येत...ते मुलांना काय शिकवणार?
ह्याला अपवाद असणार्‍या शाळा असतीलही ..अजुनही काही काही शाळा चांगल्या असतील...पण किती?? आणि सगळ्यांची मुले त्या इतक्या कमी शाळांमधे कशी जाणार? आज मराठी माध्यमाच्या शाळा चालवणे अवघड झालेय ते केवळ मराठी मुले इंग्रजी माध्यमाकडे वळतात म्हणून नाही..तर त्या दर्जाच्या शाळा आणि शिक्षक नाहीत म्हणूनसुद्धा !!!!! आहेत ते फक्त "गुर्जी" आणि "म्याडम"...

मुद्दा 2: "इंग्रजी माध्यमात घातल्याने मुलांना मराठीची गोडी कशी लागणार?"

मराठी माध्यमात घातल्याने मुलांना आपोआप मराठीची गोडी लागते? आजही कितीतरी मराठी शाळांमध्ये सातवी-आठवीच्या मुलांना धड एक परिच्छेद पूर्ण वाचता येत नाही...आणि मुलांना एकदाचे मराठी शाळेत घातले की पालक म्हणून तुमची जबाबदारी संपली का ? शाळेत मुले कमी वेळ असतात..घरी जास्त असतात... मुलांना मराठीची गोडी लागावी म्हणून तुम्ही काय करताय ? किती वेळा त्यांना मराठी गोष्टी वाचून दाखवता? किती मराठी गोष्टीची पुस्तकं आणून देता ? किती वेळा त्यांच्याशी चांगल्या आणि ऊच्च प्रतीच्या मराठीत बोलता ? माझ्या ओळखीचे एकजण आहेत..ते त्यांच्या मुलांशी स्पर्धा लावतात की जो सलग जास्तीत जास्त वाक्य मराठीत बोलेल तो जिंकला... सुरुवातीला थोडे दिवसच मुलांनी त्यांना जिंकण्याचा आनंद दिला... आणि नंतर हरण्यात त्यांना जास्त आनंद वाटु लागला...कारण....उद्दिष्ट साध्य झाले होते....त्यामुळे भाषेची गोडी ही फक्त शैक्षणिक माध्यमावर अवलंबून नसून त्यात पालकांचा फार मोठा सहभाग असावा लागतो...

मुद्दा 3: ""इंग्रजी शाळेत गेली की मुले आपली संस्कृती विसरतात... त्यांना आपली संस्कृती शिकवली जात नाही.."

अहो..पण त्यांच्यासाठी शाळा कुणी निवडली ? तुम्हीच ना...आजही खूप इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे आपली संस्कृती शिकवली जाते...सगळे सण-समारंभ साजरे होतात...पहिलीपासून मराठी शिकवले जाते...उच्च माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ज्या भाषेत आहे, त्या भाषेत जर मुले पहिल्यापासुन शिकली तर त्यांना पुढे अवघड जात नाही.... शाळा निवडताना नीट चौकशी करून निवडली तर तुम्हाला सुवर्णमध्य नक्की साधता येईल.. 

शेवटी काय...हे ज्याचे त्याचे मत झाले...पण...दांभिकपणे नुसती चर्चा न करता जर आपण आपल्या परीने काय करू शकतो ह्याचा विचार केला तर मार्ग नक्की सापडतो.... मुले कुठल्याही माध्यमात शिकली तरी...ती "शिकताहेत" का नाही....हे पाहणे पालक म्हणून तुम्ही कराल तर माध्यम आडकाठी असणार नाही....

धन्यवाद!!!!!!!


Monday, 10 September 2012

पगारी बायको


नुकतीच पेपरला बातमी वाचली - केन्द्रीय महिला आणि बालकल्याण विभागाने नवीन विधेयकाचा प्रस्ताव आणला आहे - पुर्णवेळ गृहिणी आता पगारी होणार. म्हणजे दर महिन्याला त्यांचे पतीदेव त्यांना मासिक वेतन देणार.... किती ? तर पतीच्या पगाराच्या १०%.... सही ना !!!! पण खरी गम्मत हि आहे कि खरोखर जर असे विधेयक मंजूर होऊन त्याचा कायदा झाला तर जी काही मजा उडेल त्याच काय ? काय होऊ शकेल ह्या कायद्यामुळे ?  जरा गमतीने पहिले ह्याकडे तर -

१. जर पत्नी पगार घेत असेल तर दर वर्षी पगारवाढ आली. पगारवाढ आली म्हणजे तिचा "Annual Performance" पाहायला नको का ? "Annual Appraisal" हि करायला पाहिजे !! मग हे करताना कुणाला तरी कमी जास्त रेटिंग मिळणारच. मग काहीसे असे संवाद होतील घराघरात -
"अहो, हे काय फक्त ८% चा वाढवून दिलाय तुम्ही मला पगार ..."
"अग, मग तुला किती अपेक्षित होता ?"
"आता शेजारच्या जोशी वहिनींना पहा ... भावोजींनी चांगला १२% वाढवून दिलाय ह्यावर्षी पगार !!"
"अग, जोशी वहिनींची गोष्ट  वेगळी आहे.. त्यांचा performance(!!??!!) असतोच तसा .."
झाले... म्हणजे नवरा बायकोमध्ये अगोदरच  होणारया  जिव्हाळ्याच्या  शाब्दिक  आदान  प्रदानात  आणखी एका विषयाची भर ...

२. ह्या विधेयकाचा आम्ही काही बारकाईने अभ्यास केलेला नाही, पण हा पगार देताना TDS कापून द्यायचा का नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसे असेल, तर हि रक्कम बायकोला करपात्र करून नवरयासाठी करमुक्त करावी.. म्हणजे कदाचित पुरुषवर्गात थोडेतरी उत्साहाचे वारे येईल.

३. ह्या विधेयकाच्या पुष्ट्यर्थ असे हि सांगण्यात आले कि जर  पाळणाघरासाठी  किंवा  हॉटेलमध्ये  जेवण्यासाठी आपण पैसे मोजत असू तर त्यापेक्षा कितीतरी अधिक काम करणाऱ्या   गृहिणीसाठी  का  नाही ?  काही संबंध आहे का ? पाळणाघरात असलेली ताई आणि घरात असलेली आई एकाच तराजूत ? त्यांच्यात काही फरकच नाही ? हॉटेल मध्ये तुम्ही सांगाल ते आणून देणारा वेटर आणि तुमच्या मनातले ओळखून तुम्हाला आवडणारे पदार्थ बनवणारी बायको सारखेच ? म्हणजे जर कधी भाजीत मीठ जास्त पडले किंवा थालीपीठ खाली थोडे लागले तर पगारातून पैसे कमी करायचे का ?
Dominos सारखे ऑफिस मधून आल्यावर १० मिनिटात चहा हातात नाही आला तर पगारातून  कापून  घेण्यात येतील ?

ह्यातला विनोद बाजूला ठेवून खरच विचार केला आणि खरच जर असा काही कायदा आला.... आपल्या सरकार चे काही सांगता येत नाही हो ...... तर ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही.. स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणाऱ्या आणि पुरुषप्रधान संस्कृती च्या नावाने झोपेतही वाटेल तितका वेळ बोलू शकणाऱ्या तथाकथीत कार्यकर्त्यांना हे झेपते का ? ह्याने नवरा  बायको हे "संसाररूपी गाड्याची दोन चाके" न राहता "employer - employee" मालक नोकर ह्या एका नव्या नात्यात जातील. विचित्र आहे हे.... संस्कृती आणि समाजव्यवस्था  वगैरे मोठे शब्द राहू द्या पण ज्यांना पती पत्नी च्या नात्यातले हळवेपण, आपुलकी, ओलावा जपायचा आहे अशा सर्वांनी ह्या आणि अश्या  प्रकारच्या  विधेयकाला विरोध करायला हवा ....  

Monday, 2 May 2011

मित्र

कुठल्याही नविन कामाची सुरुवात देवाच्या नावाने करावी असे म्हणतात. देव आहे की नाही हे माहित नाही. पहिलाच ब्लॉग लिहितोय... देवाच्या नावाने लिहावा का ? काय लिहिणार  आपण  देवाबद्दल ?  आपल्याला कुठे  देव भेटलाय ? आणि हो.. देवाबद्दल आपण काही लिहावे अशी अजुन आपली पात्रता नाहीये. आपण आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहावे..... मित्र..

आत्तापर्यंत इतक्या लोकांनी मित्र आणि मैत्रीण ह्या विषयावर लिहिले आहे की अजुन नविन काय लिहिणार ?  पण कधी कधी खरच मनात विचार येतो... कुणाला नक्की मित्र म्हणावे ? फार वेगवेगळ्या व्याख्या असतात लोकांच्या मित्रांबद्दल... त्यात माझीही भर..

तुम्ही किती वेळा भेटता किंवा किती वेळा फ़ोनवर बोलता ह्या वर तुम्ही किती चांगले मित्र आहात हे अवलंबून नसते.. माझा एक मित्र आहे... बहुतेक वेळा आठवड्यातुन एकदा त्याच्याशी बोलणे होते फोनवर.. फ़ोनवरचा संवाद ठरलेला असतो...

"काय रे , काय म्हणतोस ?"
"काही नाही.. ठीक आहे. तू काय म्हणतोस ?"
"मी ही ठीक आहे. ऑफिस काय म्हणते ?"
"चालू आहे. बाकी काय ?"
"बाकी काही नाही. चाललय. अजुन काय विशेष ?"
"अजुन काही नाही. बस मजेत."
"चल मग ... बोलू नंतर.."

फ़ोन संपतो.  बोलू नंतर... काय ? कपाळ.... नंतर काय बोलायचे ते ही ठरलेले असते... हाच वरचा dialogue पुन्हा पुन्हा नव्याने बोलल्यासारखा..
मित्रांशी बोलताना मला २ प्रश्नांचा भयंकर राग आहे... "बाकी काय ?" आणि "अजुन काय विशेष ?"
हे प्रश्न निव्वळ वेळकाढू आहेत.. अश्या मित्रांच्या मैत्रितला भाजक भाज्याला पूर्ण भागून जातो आणि शेवटी बाकी शुन्य करून ठेवतो.

पण सुदैवाने अश्या प्रकारच्या मित्रांपेक्षा ज्यांना खरे म्हणता येतील असे जीव लावणारे मित्र जास्त भेटले (म्हणजे मिळाले ह्या अर्थी नाही.. तर खरोखर भेटले ह्या अर्थी) ह्यासाठी देवाचे आभार... इतकाच काय तो ह्या पहिल्या ब्लॉग चा अणि देवाचा संबंध... 

काय सुन्दर मित्र दिले हो... दिवसभराचा कामाचा थकवा संपवून रात्रि कट्ट्यावर जावे आणि गप्पा मारत बसाव्या.... इतके विविध विषय असतात बोलायला... दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पलुन जातो.

अहो, नुसत्या एका "hmmm ..." मधून हा होकार आहे का हुंकार आहे का खोचक अणि खवचट उत्तर आहे हे केवळ अणि केवळ खरे मित्रच ओळखु शकतात हो... एकदा मी चुकून "बाकी शुन्य" येणारया  मित्राला "hmmm" असा sms केल्यावर त्याने "म्हणजे नक्की काय समजू ?" असा प्रति sms केला. मी अगोदर "अरे म्हणजे.." असे लिहायला लागलो... त्यातले फोलपण जाणवले .... त्याला सरळ सांगितले... "तुला काय समजायचे ते समज.."

एखाद्या गाण्याची ओळ आपण गुणगुणावी आणि पुढची ओळ येत नाही.. पण गाणे तर आवडले हे ओळखून ते गाणे शोधून लगेच मेल करणारा ... तो मित्र..
मनातली दुख विसरायला लावून चार क्षण आनंदाचे करून सोडणारा.. तो मित्र...
दहा वर्षांनी भेटून सुध्धा ३ तासाच्या भेटीत एकदाही "अजुन काय" आणि "बाकी काय" ही वाक्य चुकुनही न येणारा... तो मित्र.... आणि हो.... मैत्रीण सुध्धा...
चार चार वर्ष न भेटून सुध्धा मनातली एखादी गोष्ट ज्याच्याशी share कराविशी वाटते... तो मित्र...
अश्या मित्रांची बाकी वाढतच जाते... आणि तीच आयुष्यातील शिल्लक बनून राहते...

Namaskar

This is my first attempt to blogging...
while creating the blog account, I was thinking a lot about what to name it ? what am I going to write to my blogging site ? Do I really want to blog ? lot of thoughts coming to mind.. some with a sequence.. some very randomly.... so finally thought, why not to name the blog itelf as "random thoughts".. there is no definite topic or area on which the thoughts come.. they come randomly and as they come, trying to put them in blac and white...